आज मी खूप दिवसांनी ब्लॉग लिहित आहे. खूप विचार मनात येत राहिले पण ते लिहायला मात्र वेळ मिळाला नाही. नवीन वर्षात मात्र आज मुहूर्त लागला. :) 
       आज मला काहीतरी नवीन गोष्ट तुमच्याशी share करायची आहे. माझ्या ब्लॉग वर "Blog Archive" च्या खाली "तुम्ही इथे भेट दिली आहे का?" ह्या सदराखाली"Snovel" नावाची एक लिंक आहे. त्याबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.       
       आजच्या धकाधकीच्या जगात आपल्याला सगळ्यात जास्त कमतरता जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे निवांत वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. कित्येक जणांना आपले छंद जोपासायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्यातलाच एक छंद म्हणजे वाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार? 
       पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं" म्हणजेच आपण त्याला सध्या Audio Books म्हणून ओळखतो. ही Audio Books म्हणजे CDs असतात. English मधे अनेक पुस्तकांचे Audio Books उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं आणि अश्या काही नावाजलेल्या लेखकांची कथाकथनं वगळता). Snovel India ह्या कंपनीने Audio Books बनवण्याचे आणि त्यांना बाजारात उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. पण ही Audio CD कशी असेल ते पाहायचे असेल तर आपण http://www.snovel.in ह्या लिंकला भेट देऊ शकतो. तिथे "Samples" ह्या tab मधे तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे काही मिनिटांचे Audio Tracks आहेत. आणि ह्या लिंकवर अजूनही बरीच माहिती मिळू शकते. 
        साऊंड + नॉव्हेल = स्नोवेल अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे वाचनीय साहित्य आता श्रवणीय होत आहे. आणि ह्या संकल्पनेमुळे जी चांगली पुस्तके काही कारणाने वाचनात नाहीयेत ती सुद्धा रसिक वाचकांपर्यंत पोचतील. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, काम करताना, किंवा रात्री झोपी जाताना (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!) आपण जेव्हा पुस्तक ऐकू शकतो, तेव्हा पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही अशी तक्रार आता नाही करता येणार. आता ह्या Audio CDs म्हणजे लेखनाचं जसं च्या तसं अभिवाचन असावं असा सहज विचार आपल्या मनात येईल...पण तसं न करता, संबंधीत लेखक आणि तज्ञांशी चर्चा करून लेखनात अभ्यासांती अनुकूल बदल घडवून ते श्राव्य-संपूर्ण बनवणं हे स्नॉवेलच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल. मग त्यासाठी पार्श्वसंगीताचा परिणामकारक प्रयोग असो वा आवश्यकतेनुसार कथेतील पात्रांची केलेली आखणी असो.
        आत्ताच २ महिन्यांपूर्वी डिसेंबरमधे ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे इथे भरले होते. तिथे स्नोवेलचा पण एक stall होता. आणि तिथे सुद्धा रसिक वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. साहित्य जगतातील मान्यवर लोकांनी पण तिथे भेट दिली आणि हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगितले. स्नोवेलचे आगामी आकर्षण म्हणजे येणारी Audio Books आहेत - कथामोकाशी (दि. बा. मोकाशी), समुद्र (मिलिंद बोकील), सारे प्रवासी घडीचे (जयवंत दळवी) आणि  शितू (गो. नी. दांडेकर).....
         Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे. ह्या कार्यक्रमाला सगळ्या रसिक वाचकांना आणि हा प्रयत्न आवडलेल्या लोकांना आमंत्रण आहे. कार्यक्रमाचे तपशील खाली दिलेले आहेत : 

कार्यक्रम - Snovel Media Launch - लोकार्पण सोहळा
दिवस - १९ फेब्रुवारी, २०११ 
वेळ - सकाळी ११ ते २. 
स्थळ - S.M जोशी सभागृह, "निवारा"च्या समोर, 
          नवी पेठ पुणे. 

तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल किवा तुम्हाला जर काही अभिप्राय - सुचना द्यायच्या असतील तर तुम्ही snovel.india@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधू शकता. आपल्यासारख्यांच्या रसिक वाचकांची उपस्थिती तिथे अपेक्षित आहे. 




दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट

दिवाळीत काही गोष्टी मात्र नित्यनेमाने असतात... पहाटे उठून उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान... लक्ष्मिपूजनाला केलेली पूजा, पाडवा, भाउबीज... आणि खास म्हणजे...


                     रांगोळी काढलेले स्वागत करणारे घर...


                      मनसोक्त केलेला दिवाळीचा फराळ 


                     फटाक्यांची आतिषबाजी ..!!! 



                     दिव्यांनी उजळून टाकलेले घर..!! 

अश्या ह्या सगळ्यांना नवीन उत्साह देणाऱ्या दिवाळीमुळे तुम्हा सर्वांकडे लक्ष्मीच्या पावलांनी सुख येऊ दे...!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची - समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ देत...!!! 

सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा...!!! 



         
         अमूल बटर कोणाला माहीत नाही...? आत्तापर्यंतची "Longest Running Ad" आहे ही.. त्यात बटर घेतलेली ती स्वीटशी मुलगी खूप लक्ष वेधून घेते... हातात खूप सार बटर आणि आणि थोडीशी जीभ बाहेर काढलेली :)... मनापासून एन्जॉय करत असते ती... आणि म्हणते .."Utterly Butterly Delicious...!!!" पण सगळ्यात भारी आहे त्यांचे मार्केटिंगची style...  खूप ठिकाणी त्यांच्या adds पाहायला मिळतात. 
        माझं ऑफिस हिंजवडीला आहे. ऑफिसला जाताना वाकड ब्रिज पासून थोडस पुढे  "Naturals Ice - Cream Parlor" आहे. त्याच्या थोडसं अलीकडे एक होर्डिंग आहे. तिथे नेहमी अमूलच पोस्टर असत.. खूप मस्त ads असतात आणि त्या नेहमी बदलत पण असतात ...  एक से एक भारी पोस्टर असतात ती... त्यापैकीच काही ads इथे पोस्ट करत आहे... 







प्रत्येक add मधे खूप छान पंचेस टाकले आहेत. ह्या ads design करणार्याची कल्पकता तर एक नंबर आहे.... आणि आता मला सगळ्यात जास्त आवडलेली add.....




अश्याच ह्या adds येत रहाव्यात... मी तर ह्यांची fan झाली आहे. तुम्ही पण Amul च्या ads इथे contribute करू शकता...   "Amul The Taste of India.....!!!!



            मला अजूनही आठवतात लहानपणीचे दिवस... तेव्हा काही कळत नसायचं पण सगळ्या गोष्टींच कुतुहूल असायचं... खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आनंद मिळायचा तेव्हा...  सरांनी सगळ्या वर्गासमोर कौतुक केल की होणारा आनंद....  मित्र मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळायला मिळाल्याचा आनंद... आईने डब्यात आवडीच काही दिले असेल की होणारा आनंद... कधी कधी अचानक सुट्टी मिळाली की विचारायलाच नको... आणि सगळ्यात जास्त आम्ही वाट पहायचो ते दिवाळीच्या सुट्ट्याची... महिनाभर आधीपासून सुट्टीचे बेत आखले जायचे... ह्या गोष्टी आयुष्यातला न विसरता येणारा काळ आहे .... 
         उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे म्हणजे माझे सगळे मावस अणि मामे भावंड धरून एकूण ८-१० जण आजोळी जमायचो आणि खूप धमाल करायचो. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तर खाण्याची चंगळ असायची... आजोबा तर आंब्याची मोठ्ठी टोकरी आणून ठेवायचे... सकाळी उठल्यापासून आंब्यावर ताव मारणे सुरु होत असे. मग जेवायला वेळ असेल तर काहीतरी हलका फुलका नाश्ता पुन्हा होत असे. मग आज्जी आणि सगळ्याच्या आई अंघोळ करून घ्या म्हणून मागे लागत असत. शेवटी नाईलाजाने का होईना सगळे अंघोळी करून घ्यायचे. मग सगळ्यांची पंगत बसायची जेवायला. गप्पा मारत आणि मस्ती करत जेवण कधी संपायचे ते कळायचे पण नाही... प्रत्येक जण आज्जीकडे रोज नवी फर्माईश करायचा. आज्जी पण प्रत्येकासाठी आवडीने सगळ बनवायची. नन्तर आमचे खेळ सुरु व्हायचे. दुपारची वेळ असल्यामुळे एकतर सावलीत खेळावे लागायचे किवा मग बैठे खेळ खेळायचो....जस की व्यापार, पत्ते, कॅरम, सापशिडी.. व्यापार तर इतका वेळ चालायचं की बस... जेव्हा तिथे इखादी जागा विकत घ्यायचो किवा त्या जागेवर घर बांधायचो तेव्हा ते सगळ खर असल्याचा फील यायचा. त्यामध्ये असणाऱ्या खोट्या कागदी नोटांना पण खूप जीवापाड जपायचो... :)
          आजोबांकडे मोठ्ठी बाग असल्यामुळे झाडांना पाणी घालायचं एक काम असायचं. हे काम मात्र आलटून पालटून मिळायचा सगळ्यांना आणि मज्जा म्हणजे "मी पाणी घालणार झाडांना" ह्यावरून वाद व्हायचे सगळ्याचे.. कारण इतका राजरोसपणे पाण्यात खेळायचा चान्स कोणालाही सोडायचा नसायचा.. सुट्टीतला अजून एक नियम म्हणजे मंदिरात जाण... आजोबांच्या घरापासून जवळच दत्ताच एक मंदिर होत.. दिवसातून एकदा तरी आम्ही जायचो..  जाताना आम्ही बागेतली फुलं तोडून आज्जीने दिलेल्या परडीमधे ठेवायचो. मग तिथे जाऊन स्तोत्र म्हणणे आणि देवाला प्रदक्षिणा घालणे झाले की थोडावेळ तिथे गप्पा मारणे किवा खेळणे व्हायचे.  परत आल्यावर थोडावेळ टिव्ही पाहणे ... उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक खूप मोठा आकर्षण म्हणजे दारावर येणारी कुल्फी...  दारावरचे कुल्फीवाले काका न चुकता रोज यायचे आणि आमचा सुद्धा रोज कुल्फी खाण्याचा अलिखित नियम झाला होता. आम्ही अंदाजे ८ ते १० जण बच्चे कंपनी होतो. आणि ह्या कुल्फीच्या मेजवानीमध्ये कधी कधी मोठे लोक पण असायचे. 
         मग संध्याकाळी आम्ही सगळे जण देवासमोर बसून शुभंकरोती आणि पाढे म्हणायचो. नंतर  अंगणामध्ये आम्ही हलकंसं पाणी शिंपडायचो. थोडसं गार झाल की आमची रात्रीची जेवणाची पंगत तिथेच असायची. सगळ तिथे आणून ठेवणं आणि नंतर परत ठेवण आमच लहान मुलाचं काम असायचं. आम्ही सगळेजण हे काम खूप आनंदाने करायचो. ह्या सुट्ट्यांच्या दिवसात आवडीच्या पदार्थांसोबत सगळ्यात जास्त आम्हाला आवडणार्या गोष्टी म्हणजे .. आज्जीच्या हातच आंबटवरण, थंडगार ताक, घरच मस्त लोणचं (आंब्याच, लिम्बाच जे हव ते), कच्च्या कैरीचा तक्कू, salad - कांद्याची पात, मेथीला तिखट आणि मीठ लावून केलेला घोळाणा.... आणि ह्या सगळ्या गोष्टींची चवच अशी होती की पोट भरलं तरी मन भरायचं नाही...
          रात्री झोपायच्या काही तास आधी आम्ही गच्चीवर पण पाणी टाकून ठेवायचो कारण दिवसभर गच्ची उन्हाने खूप तापलेली असायची. मग तिथल पाणी सुकल की आम्ही तिथे गाद्या वगरे टाकून झोपायची तयारी करायचो.. पण लवकर झोपणार्यांपैकी  कोणीही नव्हते. मग आमचा तो वेळ गोष्टी सांगण्याचा असायचा... त्या पण भुतांच्या... मग मधेच काही जणांना भीती वाटायची आणि आईची आठवण यायची... :)  मग घरच्यांचा खूप ओरडा खाल्यावर कसेबसे आम्ही झोपायचो.  तिथे सुद्धा आमच्या जागा ठरलेल्या असायच्या. आणि आमची झोपण्याची रजई पण ठरलेली असायची... मग आज्जीच्या जवळ कोण झोपणार ह्याचे पण नंबर असायचे... हे सगळ नंबर वगरे फक्त भांडण होऊ नये म्हणून... खरच  काय पण ते दिवस होते... ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिना कसा निघून जायचा हे कळायचंच नाही...
          या सुट्ट्या मी अजूनही खूप मिस करते... आता हे दिवस फक्त आठवणीमधेच उरले आहेत. ह्या सुट्ट्या म्हणजे आमच्यासाठी वर्षभराच टोनिक होत. पण  आता कित्येक वर्ष झाली आहेत अश्या सुट्ट्या मी घालवल्या नाहीत. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना enjoy करणं कुठेतरी हरवलं आहे अस वाटत... पण कितीही वर्ष उलटली तरी ही आठवणींची शिदोरी मात्र नेहमीच सोबत असते. त्यामुळे आठवणींचा कप्पा हळूच उघडायचा आणि हवं ते पान वाचायचं.. ह्या busy life मधे refresh होण्यासाठी अजून कोणता चांगला मार्ग असेल? :)



           
             आत्ताच FIFA चा fever संपला. World cup च्या matches चा उत्साह सगळीकडेच होता. ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाल्येल्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे शकिराच गाणं "Wakka Wakka" आणि सगळ्यांच्या चर्चेत असलेला "Paul The Octopus". आता सगळ्यांचा लाडका झालेला paul FIFA च्या matches च अचूक भाकीत कसे काय सांगतो हे अजून न उलगडलेलं कोडच आहे.
            ह्या paul ची एक विशिष्ट पद्धत आहे भाकीत सांगण्याची... सध्या त्याचे वास्तव्य एका aqurium मधे आहे. प्रत्येक match च्या एक दिवस आधी त्याच्याकडे 2 bowls ज्यामध्ये त्याच खाण आहे असे सोडण्यात येतात. प्रत्येकामध्ये ज्या टीम्सचा match आहे त्याचं एक एक अस flag ठेवण्यात येतो. एका दिवसाच्या आत हा paul ज्या bowl मधले खातो ती टीम जिंकणार असते. :) आत्तापर्यंत फक्त एकदाच ह्याच भाकीत चुकले आहे म्हणे.... एकूणच हा सगळा प्रकार खूपच मनोरंजक आहे. काहीजण असही म्हणत आहेत की paul ला strips असलेले flags जास्त आकर्षित करतात म्हणून तो असे भाकीत करतो. ह्यावर अजून खूप तर्कवितर्क लढवून झाले आहेत पण अजूनही काही नेमके कारण कळाले नाहीये.
             सध्या हा paul जर्मनीमधे राहतो. मूळचा तो इंग्लंड चा आहे. ह्या वेळेसच्या world cup फायनल मधे स्पेन आणि नेदरलेन्दस होते. आणि आपल्या paul ने विजयाचा कौल स्पेनच्या बाजूने दिला. आणि स्पेन मधे उत्साहाला उधाण आले. आणि अखेर स्पेन world cup विजेता झाले. त्यामुळे paul च्या भाकीत वर्तवण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवावाच लागला. जेव्हा paul ने जर्मनीच्या विरोधात निर्णय दिला होता तेव्हा त्याने सगळ्या जर्मनीच्या लोकांचा रोष ओढवून घेतला होता. तिथल्या लोकांनी तर त्याला खाण्याची तयारी पण दाखवली होती. :D तेव्हा स्पेनने paul ला सुरक्षा देऊ असे सांगितले.
              सध्या असे ऐकण्यात आले आहे की स्पेनने जर्मनीकडे paul ची मागणी केली आहे. ह्यासाठी स्पेन काहीही किंमत मोजायला तयार आहे. आणि ह्या बदल्यात स्पेन त्यांच्याकडील एखादा जलचर प्राणी देऊ करत आहे. ह्यावरून paul ची किंमत किती वाढली आहे ते दिसून येते. त्याचे वय 2 वर्ष आहे सध्या.... आणि जर जर्मनीने त्याला स्पेन कडे सुपूर्त केले तर त्याच्या आयुष्याचे शेवटचे दिवस तो स्पेन मधे घालवेल असा अंदाज आहे. ह्या paul ला उदंड आयुष्य लाभो...!!! :)


           प्रियाचा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे पावसाळा... बाहेर हलकासा पाऊस पडत होता. पावसामुळे बाहेरच वातावरण सुद्धा खूपच romantic झाल होत... तिला वाटत होत की अर्णवने लगेच तिला ऑफिस मधे pick up करावं आणि दोघांनी बाहेर भटकायला जाव.. तिने त्याला call केला पण त्याने तिचा call कट केला. तिला कळाले की तो busy आहे त्याशिवाय तो फोन कट करणार नाही. इकडे अर्णवला माहीत होत की आज प्रियाचा नक्कीच बाहेर भटकायचा मूड असेल. म्हणूनच तो पटकन काम संपवून तिला surprise देण्याचा प्लान करत होता. म्हणून त्याने मुद्दामच तिचा call घेतला नाही.
         अर्ध्या तासाच्या आत तो bike घेऊन तिच्या ऑफिस खाली येऊन थांबला. आणि त्याने तिला call केला की मी खाली आलो आहे पटकन ये. तिच्या चेहर्यावरचा आनंद पाहून तिच्या मैत्रिणीला लगेच कळाल की प्रियाचा भटकायला जायचा plan बनला वाटत... ती म्हणाली की मी सांगते बॉसला तू जा पटकन... प्रिया 5 मिनिटात खाली आली. तिच्या चेहऱ्यावरची smile पाहून अर्णवला हा प्लान बनवल्याच सार्थक वाटल.
         अर्णवच्या bike ने स्पीड घेतली आणि दोघही मग खडकवासल्याकडे निघाले. बाहेर पडणारा हलकासा पाउस दोघांनाही त्यांच्या लग्नाआधीच्या भेटींची आठवण करून देत होता. पावसाचा वेग हलकासा वाढला पण दोघांनाही त्याची काही पर्वा नव्हती... अर्णवला गाण्याची आवड होती. तो bike var मस्त गाणं गुणगुणत होता. प्रियाने त्याच्या पाठीवर डोकं टेकवल आणि ती सगळ्या गोष्टींचा मनसोक्तपणे आनंद घेत होती. मग दोघानाही थोडीशी भूक लागली. रस्त्यातच एका ठिकाणी थांबून त्यांनी मस्त कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचा आनंद घेतला.
           काही वेळातच ते खडकवासल्याला पोचले. तिथे फारशी गर्दी नव्हती पण काही couples मात्र पावसाचा आनंद लुटायला तिथे आले होते. मग दोघही एका खडकावर बसले आणि त्यांनी पाण्यात पाय सोडले. पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य पण एकदम खुलून आल होत.
           कामाच्या गडबडीमुळे दोघांनाही काही दिवसात एकमेकांसाठी निवांतपणे वेळच मिळाला नव्हता. प्रियाला आधीपासूनच अर्णवचा अस मनातल ओळखून वागण्याचा स्वभाव खूप आवडायचा. आणि अर्णवला मात्र surprise मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तो मिळाल्याच समाधान बघायला खूप आवडायचं... त्याने तिचे हात हातात घेतले. कधी कधी बरच बोलायचं असत पण शब्दच सापडत नाहीत. तसच काहीसं आज झाल होत. आज ते काहींच न बोलता सगळ काही बोलत होते. तिला अस वाटत होत की हा क्षण इथेच थांबवा... बराच वेळ ते तिथे बसून राहिले. मग पावसाचा जोर हळूहळू वाढायला लागला. तशीही संध्याकाळ पण होऊन गेली होती. मग ते परत निघाले. प्रियाच्या मनात मात्र अशी अनपेक्षित अशी पावसातली "date" घर करून गेली...


        तो आणि ती ह्यांच लग्न होउन काही महिनेच झाले होते. आता कुठे ते एकमेकाना नीट ओळखायला लागले होते. तो म्हणजे एक प्रेमळ,समंजस आणि व्यवहाराच भान असणारा नवरा आणि ती पण एक थोडीशी हट्टी - चिडचिडी आणि हळवी बायको... पण ते दोघ नवरा बायको पेक्षा एकमेकांचे मित्र जास्त होते. एकमेकाना चिडवण,  रूसण, मनवण ह्यामुळे  त्यांच्या नात्यात गोडवा टिकून होता...
       दोघांनाही movies ची खूप आवड होती. असच ते एकदा TV पाहत असताना त्याना असे कळाले की एक contest आहे. आणि त्यात जे couple जिंकेल त्यांना त्या शो मधल्या host couple सोबत डिनर साठी जाता येणार आहे. त्यांना दोघांनाही त्या host couple ला भेटायची खूप इच्छा होती कारण ते त्यांचे आवडते कलाकार होते. त्यांनी सहजच गम्मत म्हणून त्या contest मधे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पाठवले आणि ते ह्या गोष्टीला विसरून पण गेले.
       एका दिवशी अचानक त्यांना फ़ोन आला की ते ही contest जिंकले आहेत आणि त्यांना डिनर साठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जायचे आहे. ते दोघे पुण्याला रहात असल्यामुळे त्यांना जाणे काही अवघड नव्हते. मग दोघांनीही त्या खास दिवसासाठी मस्त shopping केली आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्र मैत्रिणीना पण सांगितले. सगळ्यांचे अभिनंदन झेलून दोघही मस्त मूड मधे होते त्या दिवशी. मग त्यांनी त्या शो मधल्या लोकांशी
फ़ोन वर बोलून भेटायची जागा वगरे सगळे माहित करून घेतले. ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी तिकडे जाण्यासाठी  स्वतःच्या कारने निघाले. 3 तासात ते त्या ठिकाणी पोचले.
         तिकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात त्यांची host couple शी भेट झाली. एका पंचतारांकित hotel मधे त्यांची भेट ठरवली होती. दोघही तिथे केलेली सगळी तयारी पाहून खूप खुश झाले.  थोड्या वेळ त्यांच्या show बद्दल गप्पा झाल्या.
दोघानी त्यांचे autographs घेतले. त्यानंतर तिथे मंद सुरात music सुरु होत. host couple मधल्या त्याने "ती" ला डान्स साठी विचारल. तिने नजरेनेच त्याची परवानगी घेतली आणि ती त्याच्यासोबत डान्स साठी गेली. मग त्याने पण host couple मधल्या तिला डान्स साठी विचारल. ती लगेच तयार झाली आणि दोघही मस्त डान्स करत होते. "ती" जेव्हा आपल्या आवडीच्या host सोबत डान्स करत होती तोपर्यंत relax होती. पण जेव्हा "तो" त्याच्या आवडीच्या host सोबत डान्स करायला लागला तेव्हा मात्र "ती" अस्वथ झाली. तिचा एकच स्वभावदोष  होता की ती त्याच्याबद्दल खूपच possessive होती. त्यानंतर पूर्ण वेळ ती स्वतःचा डान्स एन्जॉय करण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष ठेवण्यात मग्न होती. तिला सारख असच वाटत होत की "तो" आज जरा जास्तच खुलला आहे. आणि त्यांच तिच्याकडे काहीच लक्ष नाहीये. म्हणूनच "ती" पूर्ण वेळ अस्वथ होती. host ने तिला विचारले सुद्धा की काय झाले आहे? पण तिने थकले आहे इतके सांगुन वेळ मारून नेली.
          मग लगेच सगळे पुन्हा त्यांच्या टेबलवर येउन बसले. "त्या" ने विचारले की खूप त्रास होत आहे का?
तेव्हा "ती" ने काही नाही थोड़ी थकले आहे इतकच सांगितल. आणि मग थोड्याच वेळात त्यांच मस्त जेवण झाल आणि सगळी संध्याकाळ पण खूप छान गेली फ़क्त तिच्या मनात "त्याच" आजच behaviour घर करून गेल. मग रात्री खूप उशिरा गप्पा वगरे झाल्यावर त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
          खूप उशीर झाला म्हणून ती आणि तो ह्यांनी hotel मधेच एक रूम घेतली एका रात्रीसाठी. त्याला कळत होत की "तीच" काहीतरी बिनसल आहे. त्याने रूम मधे गेल्यावर तिला विचारायचा खूप प्रयत्न केला. पण तिने "काही नाही" असेच उत्तर दिले. कारण तिचा त्याच्यावर विश्वास नव्हता असे नाही. पण तिला त्याचे आजच वागणे जरा खटकले. त्याला मात्र तिच्या मनात चाललेल्या विचारांचा काही थांगपत्ता नव्हता. शेवटी विचार करता करता त्याला पण झोप लागून गेली.
          सकाळी दोघही परत जाण्यासाठी निघाले. ती थोडीशी शांत झाली होती. कारमधे त्यांच कालच्या भेटीबद्दल बोलण सुरु होत. ती त्याचा चेहरा नीट न्याहाळत होती. शेवटी तिने विचारालच की कस वाटल मग डान्स करताना? तो म्हणाला की खूप छान वाटल. तिचा चेहरा लगेच पडला. तो कार चालवत असल्यामुळे त्याच तिच्या चेहर्याकडे लक्ष नव्हत. मग तो म्हणाला की "मला अस वाटल की आपण आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला अश्याच एखाद्या ठिकाणी येऊ. आणि फ़क्त दोघच मस्त एन्जॉय करू. हे ऐकल्यावर तिला लगेच त्याच्याबद्दल असा विचार केल्याबद्दल स्वतः चा राग आला. तिला त्याच्याबद्दल असा विचार केल्याचा खूप पश्चाताप झाला. तिच्या मनात लगेच असा विचार आला की तो त्या host सोबत असताना सुद्धा आपला विचार करत होता. म्हणजे त्याच आपल्यावर किती प्रेम आहे! ("आपल्या आवडीच्या व्यक्तीने आपल्यासोबत असताना दुसरयाचा विचार करण चांगल की दुसरयासोबत सोबत असताना आपला विचार करण चांगल?") तिने लगेच त्याला काल संध्याकाळपासून काय काय वाटल ते सांगितल. त्याने ते सगळ ऐकल आणि त्याच्या चेहर्यावर एक हलकस हसू ऊमटल. तो म्हणाला की "वेडाबाई पुन्हा कधीही असा विचार करू नकोस. तुझ्यासारखी गोड आणि चिडकी बायको असताना मला दुसरया कोणाचा विचार करावासा वाटेल का?" लगेचच तिच्या ओठांवरती हसू उमटले आणि तिने समाधानाने त्याच्या खांद्यावर
डोके टेकवले.