आज खूप दिवसांनी ब्लॉगवर काहीतरी टाकण्याचा मूड झाला... मनात विचार आला की अश्या कितीतरी म्हणी असतील ज्या आधीच्या काळात नेहमी बोलण्यात येत असतील पण आता त्या माहीत सुद्धा नसतील... ह्या म्हणींना आठवण्याचा एक प्रयत्न म्हणून मी माझ्या आजीला हट्ट करून करून काही  म्हणी आठवायला लावल्या आणि त्या मी इथे टाकत आहे... ह्यातल्या बऱ्याच म्हणी कदाचित माहीत असतील पण तरीही जराशी मजा म्हणून...

- वेल्हाळीला दुक्ख झाल चोळून चोळून लाल केल...
- खादाड खाऊ लांडग्याचा भाऊ..
- नाकापेक्षा मोती जड
- दात आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दात नाहीत
- बाजारात तुरी भट भटणीला मारी
- नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
- आवळा देऊन कोहळा काढणे
- ताकाला जाऊन भांड लपवणे
- मला पहा आणि फुलं वाहा
- तोंडात तीळही न भिजणे 
- आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्टे
- सोय जाणेल तो सोयरा
- दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही
- घोडा आपल्या गुणाने दाणा खातो
- घरात नाही दाणा म्हणे मला बाजीराव म्हणा
- कोंबडा आरवला नाही तरी उजाडायच राहत नाही
- सरड्याची धाव कुंपणापर्यंत
- जावायाच पोर हरामखोर
- मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली (ही म्हण मकरंद अनासपुरेच्या तोंडून एका पिक्चरमधे ऐकली आहे... :) )