Showing posts with label सण - उत्सव. Show all posts
Showing posts with label सण - उत्सव. Show all posts

        दिवाळी हा आपल्याकडे लहान-मोठ्यांपासून सगळ्या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणांवर साजरा केला जाणारा सण आहे. आणि मला खास करून दिवाळी खूप आवडते. कारण दिवाळी जवळ आली की काही दिवस आधीपासूनच सगळी तयारी सुरु होते. सगळ्यात आधी सुरुवात होते ते खरेदीची. नवीन ड्रेस, फटाके, रांगोळ्या आणि आकाशकंदील किवां तो बनवायचे सामान वगरे... :)
        कोजागिरी पौर्णिमेपासून आपण आकाशकंदील लावतो. लहानपणी आम्ही  उत्साहाने घरीच आकाशकंदील बनवत असू. आजकाल मात्र खरच विकत आणण्यामुळे तो बनायची मजा खूप मिस करत आहे मी. रांगोळी काढणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. दरवर्षी काहीतरी नवीन शक्कल लढवून रांगोळी सजवायचो. कधी फुलांच्या पाकळ्या, कधी चमकी कधी वेगवेगळ्या पणत्या सजवून केलेली सजावट, कधी लाकडाचा भुसा रंगवून तो रांगोळीत भरायचो आणि कधी कधी तर तांदूळ रंगवून ते रांगोळीमध्ये भरायचो.

           दिवाळीमध्ये न विसरता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीच्या २-३ दिवस आधीपासूनच आई फराळ बनवायला सुरुवात करायची. त्यात असायचे ते चिवडा, लाडू, चकली (माझा सगळ्यात आवडता पदार्थ), शेव, करंजी, शंकरपाळे आणि अनारसे. कितीदा तरी आईला मदत करायच्या बहाण्याने काही पदार्थांना थोडे थोडे खाउन पाहिले आहे. :) हा फराळ आजकाल बाराही महिने बाहेर जरी मिळत असेल तरी दिवाळीच्या दिवसांत ह्या फराळाची चव काही वेगळीच लागते. आणि आईच्या हाताची चव ह्या सगळ्या पदार्थांची लज्जत खूप वाढवते.

          दिवाळीच्या पहाटे म्हणजेच नरकचतुर्दशीला लवकर अंघोळ केली नाही तर नरकात जाऊ अशी लहानपणी खूप भीती वाटत असे. :) आणि त्यामुळेच एरव्ही कधी लवकर न उठणारे आम्ही ह्या दिवशी न चुकता लवकर अंघोळ करून घ्यायचो. अभ्यंगस्नान म्हणजे आई आम्हाला अंघोळीच्या आधी ओवाळायची, तेल लावून द्यायची आणि मग मस्त पैकी वासाचे तेल आणि उटणे ह्यासोबत अभ्यंगस्नान पार पडायचे. अजूनही अभ्यंगस्नान असेच पार पडते फक्त आता मी माझ्या सासरी असते. :)

           आम्ही दरवर्षी भाऊबीजेसाठी आजोळी जायचो. तिथे मामा - मावशी आणि   आम्ही सगळे भावंड खूप मजा करायचो. तिथे आजोबांनी आमच्यासाठी फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे ते पण एकदम भरभरून... :D अगदी काय उडवू  आणि काय नको असा होऊन जायचं. तिथे जो फटाका जरा कमी प्रमाणात असायचा त्याच्यावरूनच सगळ्यांची भांडाभांडी व्हायची. मग कसेतरी करून वाटणी व्हायची आणि थोड्या वेळासाठी शांतता असायची. आणि बच्चेकंपनी म्हणजे आमचे लहान भावंड आमच्याकडून अगदी भांडून फटाके वगरे घायचे पण त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते उडवण्याची जिम्मेदारी पुन्हा आमच्यावरच यायची. :)     

         आता ही सगळी मजा जरी आठवणींमध्ये राहिली असली तरी नव्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. Eco-Friendly दिवाळी साजरी करण्याची आपल्या पर्यावरणाची गरज आहे. जास्त फटाके न फोडता हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यात आपण हातभार लावायला हवा. ह्या दिवाळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून जावोत, जुनी भांडणे आणि रुसवे - फुगवे विरून जावोत आणि नव्या इच्छांचा आणि नवीन कल्पनांचा दीप सर्वांच्या मनात अखंड तेवत राहो...  सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
         





आजचा दिवस अतिशय शुभ समजला जातो. कारण हा मराठी संवत्सरातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे कोणतेही नवीन कार्य ह्या दिवशी सुरु करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीचे पूजन करवून त्यांच्या  शिक्षणाचा श्रीगणेशा करतात.

पुराणकाळात महिषासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. आपल्या दुष्ट कृत्यांनी त्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्याचा वध एका स्त्री च्या हातून होईल आणि अन्य कोणी त्याला मारू शकणार नाही असा त्याला वर मिळालेला होता. अशी स्त्री तिन्ही लोकात नाही म्हणून तो खूपच उन्मत्त झाला होता. तेव्हा अष्टभुजा देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस त्याच्याशी तुंबळ युद्ध करून दहाव्या दिवशी त्यास ठार मारून त्याच्यावर विजय मिळवला. म्हणून या नऊ  दिवसांना नवरात्री आणि ह्या दहाव्या दिवसाला 'विजयादशमी' असे म्हणतात. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा हा महत्वाचा दिवस आहे.

त्या काळी रघु नावाचा एक उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा एक राजा होता. कौत्स नावाच्या ब्राम्हणाला गुरुदक्षिणा म्हणून आपल्या गुरूंना १४ कोटी सुवर्णमोहरा हव्या होता. तेव्हा कौत्स मदत मागण्यासाठी रघु राजाकडे आला. रघु राजने आपली सगळी संपत्ती आधीच दान केल्यामुळे त्याचाकडे इतकी संपत्ती नव्हती. पण त्याने कौत्साला ३ दिवसात इतक्या सुवर्णमोहरा देण्याचे आश्वासन दिले. आणि रघु राजाने इंद्रासोबत युद्ध पुकारले. तेव्हा कुबेराने घाबरून अयोध्यानगरच्या बाहेरील शमीच्या आणि आपट्याच्या झाडांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव केला. तेव्हा रघु राजाने त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमोहरा कौत्साला दिल्या आणि बाकी सगळ्या मोहरा प्रजाजनांमध्ये लुटवून टाकल्या. त्याचे प्रतिक म्हणून आजच्या दिवशी शमीच्या झाडाची किवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर ह्या झाडांची पाने लुटतात आणि ती आप्तेष्टांना सोने (सुवर्णमोहरांचे प्रतिक) म्हणून वाटतात.

ह्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यासाठी प्रस्थान केले आणि त्यांना विजय मिळाला म्हणून हा दिवस शुभ मानतात. तसेच अज्ञातवासात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती अशी आख्यायिका आहे. आणि अज्ञातवासानंतर पांडवांनी ह्याच झाडातून आपली शस्त्रे धारण केली. म्हणून ह्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. ह्या दिवशी सरस्वतीपूजनासोबतच घरामध्ये असलेल्या वाहनांची आणि पोथी - पुराणांची पूजा केली जाते. आणि व्यापारी लोक ह्या दिवशी आपल्या यंत्रसामुग्रीची आणि कामाच्या हत्यारांची पूजा करतात.  आणि हा दिवस सोने खरेदीसाठी सुद्धा शुभ मानला जातो.

म्हणूनच सर्व वाचकांना हा सण खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो...!!!  "दसरा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा..!!!"






आनंद घेऊन आला हा "दसरा" सोने लुटून करूया साजरा..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी इच्छा... सोन्याहून अनमोल अश्या माझ्या शुभेच्छा...!!!


माझ्या ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना आणि पाहुण्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.. :)




दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट

दिवाळीत काही गोष्टी मात्र नित्यनेमाने असतात... पहाटे उठून उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान... लक्ष्मिपूजनाला केलेली पूजा, पाडवा, भाउबीज... आणि खास म्हणजे...


                     रांगोळी काढलेले स्वागत करणारे घर...


                      मनसोक्त केलेला दिवाळीचा फराळ 


                     फटाक्यांची आतिषबाजी ..!!! 



                     दिव्यांनी उजळून टाकलेले घर..!! 

अश्या ह्या सगळ्यांना नवीन उत्साह देणाऱ्या दिवाळीमुळे तुम्हा सर्वांकडे लक्ष्मीच्या पावलांनी सुख येऊ दे...!! ही दिवाळी तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची - समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ देत...!!! 

सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा...!!!