काही दिवसांपूर्वीच मी PINK movie पाहिला. मला खूप आवडला म्हणून त्याविषयी काही लिहीतीये.
जन्म झाल्यापासून मुलगी आणी मुलगा हा भेद निसर्गाने केला आहे पण समाजाने तो चुकीच्या पद्धतीने लादत रहावा असे नाही. जन्म देण्याच वरदान आणी जबाबदारी दोन्ही स्त्री ला मिळाली आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळी बंधने तिच्यावरच असावेत. भारतीय समाजाची मानसिकता खूप परखडपणे इथे मांडली आहे.
   ह्या movie चा plot असा आहे की एक मुलगी एका मुलावर attempt to rape ची case file करते. आणी तो मुलगा ह्या मुलीला Call Girl / sex worker ठरवतो आणी स्वतः सुटण्याचा प्रयत्न करतो. कोर्टमधे अमिताभ मुलींकडून ही case लढत असतो.  तेव्हा त्याने मांडलेले मुद्दे खूप सुरेख आहेत.
        मुलींनी रात्री घराबाहेर राहू नये आणी कामानिमित्त ती रहात असेल तर ती "तसलीच"  असण्याच लेबल लागत. मुलींनी skirts -  jeans सारखे कपडे घालू नयेत कारण असे कपडे वाईट प्रकार होण्यासाठी जबाबदार असतात. Social drinking करणाऱ्या मुली वाईट चालीच्या असतात पण मुलांनी drink केल तर ते फक्त health hazard आहे. जर एखादी मुलगी Party ला जात असेल आणी drink करत असेल तर तिच्यासोबत काहीही करता येईल असा मुलांचा समज असतो. एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत कुठे बाहेर गेली तर त्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीला तिची संमती समजली जाते. कारण काही गैरप्रकार झाला तर मुलाला काहीही न विचारता मुलीलाच म्हणतात की तू का तिथे का गेली होतीस?
     अमिताभने भारतीय विचारांचा संकुचितपणा दाखवून देतानाच मुलामुलींना खूप काही सांगितले आहे. प्रशासनावर विश्वास आणी आपल्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्याची माहिती असेल तर आपण आपल्या हक्कांसाठी लढू शकतो असा दावा केला आहे. मुलांनाही आम्ही equality ला मानतो पण तसे वागतो का ह्यावर विचार करायला लावला आहे. तसच मुलांना कोणत्याही स्त्री चा एक व्यक्ती म्हणून आदर करणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले आहे.  
        Movie मधे शेवटच्या युक्तीवादात असे सांगितले आहे की - स्त्री जेव्हा "नाही" म्हणते तेव्हा हा शब्द कृती थांबवण्याचा संकेत आहे आणी तो पाळलाच पाहिजे. ह्या Movie मधली मला आवडलेली काही वाक्य खाली देत आहे. 

- "हमारे यहाँ घडी की सुई लडकीयोंका character decide करती है"
- "Our system thrashes weak people"
- "अगर लडकीया लडकोंके साथ dinner या  drinks के लिये जाती है तो वो उनकी अपनी choice होती है available होने का sign board नही"
- "ना" सिर्फ एक शब्द नाही है... अपने आप मे पूर्ण वाक्य है
- "आज तक हम गलत direction मे effort करते रहे है... We should save our boys not our girls... because if we will save our boys then our girls will be safe". 

हा movie आवर्जून पाहण्यासारखा आहे. कारण हा movie पाहिल्यानंतर प्रत्येकजण,  आपण खरच प्रगत आणी स्त्री समानता मानणारे आहोत का हे पडताळून बघेल ह्याची मला खात्री आहे. 


Australia-Sydney मधे मे ते जून च्या काळात 3 आठवड्यासाठी Vivid Sydney चा festival असतो. वर्षातून एकदा होणारा हा सोहळा Lighting Festival म्हणून ओळखला जातो. ह्यामध्ये Sydney च्या central popular places वर lights project केले जातात.
ही संकल्पना 2009 ला सुरु झाली आणी 2012 ला जास्त famous झाली. 2012 ला 500, 000 पेक्षा जास्त लोक आले आणी जवळपास $ 10 million चा फायदा इथल्या सरकारला झाला. 2013 मधे हेच उत्पन्न $20 million पर्यन्त गेल.
मी ह्या जून मधे हा show Opera house, Harbor lights, The rocks, Circular Quay,  Central Park आणी Darling harbor इथे पाहिला. हा show free of cost असतो. खूप उत्तम तंत्रज्ञान वापरून सगळीकडे रमणीय देखावे तयार करतात. मला सगळ्यात जास्त Opera house आणी Harbor Bridge चे projections आवडले. मी पाहिलेल्या places चे काही फोटो इथे टाकत आहे. ह्या काळात कधी Sydney  ला आलात तर हा सोहळा मिस करु नका.

Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park
Circular Quay - Central Park

Circular Quay - Central Park


Circular Quay - Central Park

Circular Quay - Opera House

Harbor Bridge

Harbor Side

Darling Harbor

Darling Harbor




            मृत्युंजय ही कादंबरी जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतली तेव्हा ती पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवताच आली नाही. अतिशय सुंदर आणि रोमांचक पद्धतीने कथा गुंफली आहे. शिवाजी सावंत ह्यांच्या छावा आणि युगंधर ही पुस्तके पण वाचली आहेत. पण मृत्युंजय ह्या पुस्तकाच वेगळेपण म्हणजे ह्यातली भाषाशैली…. हे पुस्तक खूप साऱ्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. शिवाजी सावंत ह्यांना "मुर्तीदेवी" पुरस्कार मिळाला आहे मृत्युंजयसाठी. आणि हे पुस्तक नऊ भाषांमध्ये भाषांतरीत केले आहे. कर्णाच्या जीवनावर आधारीत अजून एक पुस्तक आहे राधेय पण मला खर सांगायचं तर मृत्युंजय जास्त आवडल आणि मनाला भावल…

            खूप सुंदर पद्धतीने सगळी कहाणी कर्ण ह्या एका योध्याभोवती फिरते जो सर्वगुणसंपन्न असूनही महाभारतात नेहमीच दुर्लक्षित राहिला. जात-वंश -कूळ ह्या गोष्टींना महत्व अगदी प्राचीन काळापासून आहे. कर्ण हा कुंती आणि सूर्याचा (कुंतीला लग्नाआधी झालेला) पुत्र होता. त्याला जन्मतः कवचकुंडले मिळाली होती ज्यांच्यात अद्भूत शक्ती होती. कर्णाला कुंतीने गंगेत सोडून दिले आणि तो एका भल्या माणसाकडे त्याचा मुलगा म्हणून वाढू लागला. कर्णाला त्याच्या जन्माच्या अजब रहस्यामुळे (कुंतिपुत्र असूनही तो एका सारथीचा मुलगा म्हणून वाढत असल्यामुळे) सगळीकडे आयुष्यभर अपमानित केले गेले. कर्णाला द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती पण ते फक्त क्षत्रियांनाच शिकवत असल्यामुळे त्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिला. मग त्याने परशुरामाकडे शिकायचे ठरवले पण त्याचा नियम असा होता की तो फक्त ब्राह्मणानाच शिकवत असे. पण कर्णाला त्यांच्याकडून ब्रम्हास्त्र शिकून घ्यायचे होते म्हणून तो खोटे बोलून परशुरामाचा शिष्य बनला. पण त्याचे खोटे उघडकीला आल्यावर परशुरामाचा नियम मोडल्यामुळे त्याने कर्णाला शाप दिला कि जेव्हा त्याला ह्या ब्राह्मस्त्राची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्याला ते आठवणार नाही.
       
           द्रौपदीचे स्वयंवर होते तेव्हा तिथे पांडव, कौरव आणि कर्ण असे सगळे आले होते. पण कर्ण समोर येताक्षणी तिने "मी सूतपुत्राला वरणार नाही" असा सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला. कर्णाच्या ह्या सगळ्या जीवनात त्याची प्रेमळ अर्धांगिनी वृषाली नेहमीच त्याच्यासोबत होती. त्याच्या जीवनातल्या कटू प्रसंगांची तीव्रता वृषालीने केलेल्या हळुवार प्रेमाच्या वर्षावाने कमी झाली. कर्ण त्याच्या संसारीक जीवनात सुखी आणि समाधानी होता.

           कर्णाचा दानशूरपणाची सगळीकडे ख्याती होती. कोणीही याचक कर्णाकडे आल्यावर रित्या हातांनी जात नसे.  महाभारतातील शेवटचे युद्ध सुरु होण्याआधी कुंती कृष्णासोबत त्याच्याकडे आली व तिने तो तिचा पुत्र असल्याचे सांगितले. आणि त्याला पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी विचारले. सगळ्यांकडून अवहेलना मिळालेल्या कर्णाला फक्त दुर्योधनाने जवळ केल्यामुळे तो शेवटपर्यंत दुर्योधनाशी मैत्रीच्या नात्यामुळे प्रामाणिक राहिला. पण त्याने वचन दिले की पांडवांपैकी तिचा एक तरी पुत्र जिवंत राहील. त्याने आपली कवचकुंडलेपण कुंतीला देऊन टाकली. कर्णाच्या दातृत्वाची परीक्षा घेण्यासाठी एका इंद्र याचकाचे रूप घेऊन आला. कर्ण नुकताच अंघोळ करून आल्यामुळे त्याच्याजवळ काहीच नव्हते तेव्हा इंदाने त्याच्याकडे आर्थिक मदतीची याचना केली. तेव्हा सगळे काही कळूनही थोडाही विचार न करता त्याने आपला सोन्याचा दात फोडून त्याला दिला.

          अश्या ह्या कर्णाला इतक्या सगळ्या गोष्टी असूनही अहंकारी असल्याचे म्हटले गेले. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर कर्णाबद्दल आपण हळुवार होतो. त्याच्याकडे आणि महाभारताकडे पहायची एक वेगळी दृष्टी मिळते. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये ब्रह्मास्त्र न आठवल्यामुळे शेवटच्या क्षणी अर्जुनाकडून अंत होतो तेव्हा मन आतून हेलावते. असा हा कर्ण - एक चांगला पुत्र, चांगला पती, चांगला मित्र आणि सर्वगुणसंपन्न योद्धा आपल्या मनातून कधीच पुसला जात नाही.….


              एखाद्या movie बद्दल लिहिण्याची तशी माझी पहिलीच वेळ… हा movie पाहायला जाताना माझ्या मनात आधीच काहीही expectations नव्हते त्यामुळे जे समोर आला ते सगळ एक मस्त surprise होत अगदी पहिल्या scene पासून ते शेवटच्या scene पर्यन्त. मला हा चित्रपट खूप आवडला  म्हणून इथे लिहितीये… ह्या movie ची story खूप खास किवा वेगळी अशी नाहीये.  ह्यामध्ये सुद्धा २ भावाचा सत्तेसाठी असलेला संघर्ष दाखवला आहे. पण हा movie आवडण्याचे मुख्य कारण आहे त्याची मस्त Cinematography जी आतापर्यंतच्या कोणत्याही सिनेमापेक्षा नक्कीच वरचढ आहे. ह्या सिनेमातले action sequence खूप जबरदस्त आहेत. साधे साधे सीन ज्या grand scale वर मांडले आहेत त्यासाठी director ला मनापसून thanks ज्यामुळे इतका चांगला movie आपल्यासमोर आला. सगळ्यांची वेशभूषा पुराणकाळातील आहे आणि त्या काळातले वातावरण खरोखर आपल्यासमोर उभे रहाते. ह्या movie मधे खूप मोठ्ठा आणि सुंदर धबधबा दाखवला आहे. ही कमाल graphic ची आहे हे माहित असूनही तो खरा वाटतो. आणि युद्धाचे scenes खूप मस्त दाखवले आहेत. युद्धाच्या मैदानात एकाच वेळी खूप गोष्टी सुरु असतानाही आपला गोंधळ न उडता आपण तिथले सगळे special effects enjoy करू शकतो. आणि जिथे movie म्हणजेच हा पहिला भाग संपतो, तो scene खूप चांगला निवडला आहे ज्यामुळे आपली उत्सुकता सुरु होते पुढचा भाग पाहण्यासाठी. 
          हा चित्रपट मूळ तेलगु आणि तमिळ भाषेत तयार झाला असून त्याला हिंदी, मल्याळम आणि फ्रेंच मध्ये डब केले आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात south style दिसून येते. ह्या चित्रपटाचे २ भाग आहेत ज्यातला एक भाग जुलै मध्ये प्रदर्शित झालेला असून दुसरा भाग जानेवारी २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या पूर्ण चित्रपटाचे काम ३ वर्ष चालू होते आणि जवळपास २५० कोटी हा movie बनवायला लागले आहेत.  सध्याच्या news प्रमाणे ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागानेच ५०० कोटीचा आकडा पार केला असून अजून दुसरा भाग यायचा बाकी आहे. :)

 मी इथे movie ची story सांगणार नाहीये फक्त मला त्यात काय आवडल ते सांगणार आहे.

 प्रभास ह्या movie मध्ये बाहुबली आणि शिवा अश्या double role मधे  दिसला आहे. प्रभासने ह्या दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावल्या आहेत. संपूर्ण चित्रपटात त्याने ह्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. उत्तम वेशभूषा, चांगला अभिनय, उच्च प्रतीच्या techniques, आणि special effects ने तयार झालेले action sequences ह्यामध्ये ह्या दोन्ही roles मस्त वाटले आहेत.
               
राणा ने भल्लालदेव हा grey shade असलेला role खूप चांगला केला आहे. आणि मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे character सुद्धा hero सारखे सर्व आघाड्यावर सर्वगुणसंपन्न दाखवले आहे. फक्त hero ची प्रजेविषयीची आत्मीयता आणि त्याची चांगली वृत्ती त्याला सर्वार्थाने नायक बनवते. राणाने Bollywood मध्ये  "दम मरो दम" हा movie केला आहे.

 तम्मना ने अवन्तिकाचा role केला आहे. पूर्ण चित्रपटात ती खूप सुंदर दिसली आहे. तिचा role खूप मोठा नाहीये पण तिने movie मधे action scenes चांगले perform केले आहेत.


 अनुष्का ने बाहुबली(प्रभास) ह्या पात्राच्या पत्नीची आणि शिवा(प्रभास) ह्या पात्राच्या आईची भूमिका निभावली आहे. movie मधे ती आपल्या मुलाची वाट पाहत असते तेव्हा करण अर्जुन सिनेमातल्या राखी ची आठवण येते. :P पहिल्या भागात तिचा  role तसा कमी आहे पण बाहुबलीच्या पुढच्या भागात बहुतेक तिची कथा मांडली आहे.

 सत्यराज नावाच्या अभिनेत्याने कट्टापा हा role केला आहे. जे लोक Whats-app वापरतात त्यांना हे नाव माहित नाही असे होणार नाही कारण कट्टापाच्या messages ने खूप धुमाकूळ घातला होता. ह्या अभिनेत्याने हा role संपूर्ण ताकदीने निभावला आहे. director ने त्याचा पेहराव, त्याचे dialogues आणि त्याची बोलण्याची आणि चालण्याची पद्धत ह्या सगळ्यावर मेहनत घेतली आहे.

 राम्या ने शिवगामी चा role खूपच चांगला केला आहे. राजमातेचा म्हणजे भल्लालदेवच्या आईचा म्हहत्वाचा role तिने केला आहे. तिच्या role मधे - राजकारणी धोरण असलेली, मुत्सद्दी, शिस्तप्रिय, तडफदार  आणि न्यायाने वागणारी स्त्री असे विविध पैलू आहेत. तिच्या संपूर्ण पेहरावावरून आणि चित्रपटातल्या वावरामध्ये राजघराण्यातला डामडौल आणि तेज दिसून येते.



ह्या movie ची सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे Hollywood ची बरोबरी करेल अशी Cinematography. हा movie पाहून नेहमीच्या typical Bollywood मसाला movies मधून ब्रेक मिळतो. आणि सगळे special effects खूप मस्त shoot केले आहेत. सगळ्यांनी हा movie एकदा तरी पाहावा.

 



         वाचण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिवाळी अंक वाचण्याच काय सुख असत ते नक्कीच कळेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी फराळाचा आस्वाद घेत दिवाळी अंक वाचत लोळत पडण्यासारख सुख नाही... :) लहान असताना अगदी नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके म्हणजे "चंपक", "चांदोबा", "ठकठक", "किशोर" आणि "चाचा चौधरी" वगरे. ही सगळी पुस्तके दर महिन्याला तर असायचीच पण दिवाळी अंक असेल तर खूप मोठ्ठा असायचा म्हणून त्याच वेगळं आकर्षण वाटायचं.
         आणि आता सुद्धा ह्या पुस्तकांना वाचताना जरी मजा येत असेल तरी पण काही खास दिवाळी अंक वाचल्याशिवाय चैन पडत नाही. काही आवर्जून वाचण्यासारखे म्हणजे माहेर, मेनका, मानिनी, मिळून साऱ्याजणी, दीपलक्ष्मी, नवल, विपुलश्री आणि मौज वगरे.. ह्या सगळ्या अंकामधला मजकूर अगदी दर्जेदार असतो. एक एक अंक असा जो एकदा हातात घेतला की सोडवतच  नाही. ह्यामध्ये सामाजिक लेख, उत्तमोत्तम मुलाखती, नवीन सिनेमांची परीक्षणं अश्या कित्येक गोष्टी असतात. प्रत्येक अंकामध्ये पाककृतींचा खजिना आवर्जून असतोच.  सगळ्या दिवाळी अंकामध्ये २ गोष्टी नक्की असतात एक म्हणजे दर्जेदार व्यंगचित्रे आणि वार्षिक भविष्य... भविष्य वगरे सारख्या गोष्टीवर विश्वास असो किवा नसो पण उत्सुकतेपोटी एकदा तरी हे भविष्य नजरेखालून घातले जातेच. :) 
          खूप सारी चांगली मासिके आहेत ज्यांचे दिवाळी अंक अगदी खास असतात. तसेच वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे सुद्धा दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात. ह्या सगळ्यांमध्ये येणारे म्हणजे  कालनिर्णय, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, चित्रलेखा, तनिष्का, गृहशोभिका, चारचौघी, श्री व सौ आणि अजून बरेच... चारचौघी मासिकाचे मेहंदी विशेषांक आणि उखाणे विशेषांक हे खूपच खास होते. ज्यांना पोलिसी कथा वाचायला आवडतात त्यांच्यासाठी पोलीस टाईम्स, दक्षता, धनंजय आणि गुन्हेगार हे उकृष्ट दर्जाचे अंक आहेत. ज्यांना विनोदी अंक वाचायला आवडतात त्यांना तर खूप पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मार्मिक, हसवंती, आवाज, धमाल धमाका, फिरकी, जत्रा, आणि श्यामसुंदर. आवाज आणि जत्रा मासिकांमध्ये मुखपृष्टावर असलेली खट्याळ खिडकी आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. :)
          वैद्यकशास्त्रावर (मेडिकल) ज्यांना वाचन करायला आवडते ते "शतायुषी" अंक घेतल्याशिवाय रहात नाहीत. ह्यामध्ये वेगवेगळ्या रोगांची सखोल माहिती, त्यावर असलेली एकदम नवीन उपचार पद्धती, डॉक्टरांचे सर्जरीचे अनुभव, रुग्णांचे अनुभव आणि त्यांनी किचकट रोगांशी दिलेला अभूतपूर्व लढा ह्या सगळ्या गोष्टी असतात. दरवर्षी ह्यांचा एका खास रोग किवां उपचार पद्धतीचा विशेषांक असतो.
           आजकाल इंटरनेटच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक वाचायला वेळ नाहीये किवा वाचण्याचा कंटाळा येतो त्यांना ऑनलाईन दिवाळी अंकाचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ह्यापैकी काही ऑनलाईन विकत घ्यावे लागतात तर काही मोफत उपलब्ध असतात.  ह्यावर्षी मी ऑनलाईन "हितगुज"(मायबोलीने प्रकाशित केलेला), "मनोगत" आणि "लोकप्रभा" वाचले आहेत. ह्यावर्षीच्या हितगुजच्या अंकात "तंत्र -मैत्र" ह्या सदरात ऑनलाईन कोर्सविषयीची खूप उपयुक्त माहिती आली आहे. ही माहिती https://www.coursera.org/ इथे सापडेल. तसेच कथाविश्व ह्या सदरात खूप छान कथा आहेत. तर मनोगत मध्ये ह्यावर्षी वेगवेळ्या विज्ञानकथांनी हजेरी लावली आहे. तसेच एक "रिक्त" नावाची कौटुंबिक कथा आहे जी मनाला चटका लावून जाते. आणि मनोगतच्या पाककृती विभागात वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे, वड्या ह्यांनी खास करून हजेरी लावली आहे. तसेच ह्या वर्षी काही नवीन दिवाळी अंक पहिल्यांदा ऑनलाईन आले आहेत जसे की "मिसळपाव" आणि "ऐसी अक्षरे".
            असे हे दिवाळी अंक सगळ्या वाचकांसाठी बौद्धिक फराळच आहेत. सगळ्या वाचनप्रेमींनी ह्याचा लाभ घ्यावा ह्यासाठी ही पोस्ट टाकण्याचा खटाटोप केला आहे. :)
       






        दिवाळी हा आपल्याकडे लहान-मोठ्यांपासून सगळ्या धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणांवर साजरा केला जाणारा सण आहे. आणि मला खास करून दिवाळी खूप आवडते. कारण दिवाळी जवळ आली की काही दिवस आधीपासूनच सगळी तयारी सुरु होते. सगळ्यात आधी सुरुवात होते ते खरेदीची. नवीन ड्रेस, फटाके, रांगोळ्या आणि आकाशकंदील किवां तो बनवायचे सामान वगरे... :)
        कोजागिरी पौर्णिमेपासून आपण आकाशकंदील लावतो. लहानपणी आम्ही  उत्साहाने घरीच आकाशकंदील बनवत असू. आजकाल मात्र खरच विकत आणण्यामुळे तो बनायची मजा खूप मिस करत आहे मी. रांगोळी काढणे हा एक आवडीचा कार्यक्रम असायचा. दरवर्षी काहीतरी नवीन शक्कल लढवून रांगोळी सजवायचो. कधी फुलांच्या पाकळ्या, कधी चमकी कधी वेगवेगळ्या पणत्या सजवून केलेली सजावट, कधी लाकडाचा भुसा रंगवून तो रांगोळीत भरायचो आणि कधी कधी तर तांदूळ रंगवून ते रांगोळीमध्ये भरायचो.

           दिवाळीमध्ये न विसरता येण्यासारखी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीच्या २-३ दिवस आधीपासूनच आई फराळ बनवायला सुरुवात करायची. त्यात असायचे ते चिवडा, लाडू, चकली (माझा सगळ्यात आवडता पदार्थ), शेव, करंजी, शंकरपाळे आणि अनारसे. कितीदा तरी आईला मदत करायच्या बहाण्याने काही पदार्थांना थोडे थोडे खाउन पाहिले आहे. :) हा फराळ आजकाल बाराही महिने बाहेर जरी मिळत असेल तरी दिवाळीच्या दिवसांत ह्या फराळाची चव काही वेगळीच लागते. आणि आईच्या हाताची चव ह्या सगळ्या पदार्थांची लज्जत खूप वाढवते.

          दिवाळीच्या पहाटे म्हणजेच नरकचतुर्दशीला लवकर अंघोळ केली नाही तर नरकात जाऊ अशी लहानपणी खूप भीती वाटत असे. :) आणि त्यामुळेच एरव्ही कधी लवकर न उठणारे आम्ही ह्या दिवशी न चुकता लवकर अंघोळ करून घ्यायचो. अभ्यंगस्नान म्हणजे आई आम्हाला अंघोळीच्या आधी ओवाळायची, तेल लावून द्यायची आणि मग मस्त पैकी वासाचे तेल आणि उटणे ह्यासोबत अभ्यंगस्नान पार पडायचे. अजूनही अभ्यंगस्नान असेच पार पडते फक्त आता मी माझ्या सासरी असते. :)

           आम्ही दरवर्षी भाऊबीजेसाठी आजोळी जायचो. तिथे मामा - मावशी आणि   आम्ही सगळे भावंड खूप मजा करायचो. तिथे आजोबांनी आमच्यासाठी फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे ते पण एकदम भरभरून... :D अगदी काय उडवू  आणि काय नको असा होऊन जायचं. तिथे जो फटाका जरा कमी प्रमाणात असायचा त्याच्यावरूनच सगळ्यांची भांडाभांडी व्हायची. मग कसेतरी करून वाटणी व्हायची आणि थोड्या वेळासाठी शांतता असायची. आणि बच्चेकंपनी म्हणजे आमचे लहान भावंड आमच्याकडून अगदी भांडून फटाके वगरे घायचे पण त्यांना भीती वाटत असल्यामुळे ते उडवण्याची जिम्मेदारी पुन्हा आमच्यावरच यायची. :)     

         आता ही सगळी मजा जरी आठवणींमध्ये राहिली असली तरी नव्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करू शकतो. Eco-Friendly दिवाळी साजरी करण्याची आपल्या पर्यावरणाची गरज आहे. जास्त फटाके न फोडता हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यात आपण हातभार लावायला हवा. ह्या दिवाळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टी जाळून जावोत, जुनी भांडणे आणि रुसवे - फुगवे विरून जावोत आणि नव्या इच्छांचा आणि नवीन कल्पनांचा दीप सर्वांच्या मनात अखंड तेवत राहो...  सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!!
         


           
           आज मी तुम्हाला आमच्या घरातल्या सगळ्या खास सदस्यांची ओळख करून देणार आहे. माझे लग्न झाल्यावर लहानपणीचा खेळ पुन्हा नव्याने सुरु झाला आहे असच वाटल मला... जस लहानपणी आपण आपल्या आवडत्या खेळण्यांना नाव देतो (विशेषकरून बाहुल्यांना) तस इथे आम्ही घरातल्या काही वस्तूंना मस्त नावे दिली आहेत. सगळ्यात आधी सांगेन ते आमच्या TV बद्दल... त्याच घरातलं लाडक नाव आहे "स्टीव्ही".. आशिष (माझा नवरा) F.R.I.E.N.D.S. च्या series चा जबरदस्त चाहता आहे. आणि हे नाव त्या series मधूनच घरात आले आहे. आणि आमच्या स्टीव्हीची खासियत म्हणजे ह्यामध्ये PIP (Picture In Picture) आहे. म्हणजे ह्यात एकाच वेळेस २ channels पाहता येतात. अर्थात आवाज एका channel चा ऐकू येतो पण हरकत नाही... :)
          अजून एक सदस्य म्हणजे आशिषची bike जिच नाव "सूझी" आहे. एकदम गर्लफ्रेंडच नाव असाव अस नाव आहे हीच.... ही पण फार लाडकी आहे आमची.... आम्ही बंगलोरला असताना तिच्यासोबतीने बंगलोर ते म्हैसूर अशी मस्त outing केली आहे.
         आणि त्यानंतर आहे आमचा लाडका "चिंटू" म्हणजेच आमचा laptop ह्याचे लाड सगळ्यात जास्त होतात. त्याला सतत कोणीतरी मांडीवर घेऊन बसलेले असते. आणि हा चिंटू आमच्या लग्नाच्या आधीपासून घरात असल्यामुळे पर्यायाने मी ह्याची सावत्र आई आहे म्हणे.. :) ह्याचे खरे कारण असे कि मी वापरल्यानंतरच काही दिवसात चिंटूची battery जरा खराब झाली म्हणजे लवकर discharge व्हायला लागली. कारण मी त्याचा सावत्र असल्याने जाच केला आहे म्हणे :( त्याचे कितीही लाड केले तरी शेवटी मी सावत्र आई आहे हे काही सत्य बदलणार नाही ना.. ;) काय करणार हे सुद्धा पचवले आहे मी आतापर्यंत....
           आमच्या घरी जुळे सदस्य पण आहेत जे खूपच आवडीने घरात आणले आहेत. त्यांची नावे आहेत "गोलू" आणि "मोलू"  जे दुसर तिसर काही नसून bean bags आहेत. आणि ह्यांना आम्ही हट्टाने एकदम मोठ्ठ्या आकारात बनवून घेतले आहे. कॉफ्फी कलरच्या ह्या bags Double XL नाहीतर त्यापेक्षाही थोड्या  मोठ्या आहेत. आणि इतक्या आरामशीर आहेत की त्यात कित्येकदा मी दुपारी जेवण झाल्यावर पेंगत पेंगत निवांत झोपले आहे. :D
          आमच्याकडे एक MP3 player नाहीतर i Pod म्हणता येईल असा पण एक सदस्य आहे. त्याचे नाव "झून" आहे. दिसायला एकदम ओबडधोबड असा आहे पण खूपच मजबूत आहे. खूप वेळा तो हातातून पडला आहे पण इंचभरही खरचटले नाहीये त्याला.. :) आमच्या सगळ्या outings मध्ये न थकता त्याने आम्हाला साथ दिली आहे. ५ ते ६ तास सलग वापरले तरी त्याला जेवायची म्हणजेच charge करायची गरज पडत नाही. :)
          आणि शेवटचा सदस्य म्हणजे आशिषचा फोन. त्याच नाव पण एकदम  cool आहे "रोमिओ"...  आता अस का आहे नाव हे मला अजूनही माहित नाहीये पण म्हटलं जाऊ दे तितकच काहीतरी वेगळ... :) तर ही  सगळी मंडळी आमच्या दोघांनाही आमच्या मुलांसारखी आहेत. ज्यांना कोणाला ह्या मंडळीची नावे माहित आहेत  ते पण त्यांना आवर्जून ह्याच नावांनी हाक मारतात. अजून नवीन सदस्य जमेल तसे घरी येत राहतील. तोपर्यंत आम्ही ह्या गोतावळ्यासोबत सुखाने नांदत आहोत. :)